आयुक्तसाहेब; अतिक्रमणांवर धाडसाने बुलडोझर फिरवाच!
अक्षरश: गुदमरलेले ‘स्मार्ट’ सोलापूर घेईल मोकाळ श्वास !!
: तमाम सोलापूरकरांसाठी एवढी मेहरबानी कराच
: अतिक्रमणांच्या विळख्याने गुदमलेल्या सोलापूरला
अतिक्रमणमुक्त कराच
: अतिक्रमण हटावासाठी दबावाला न झुगाराता ताकद लावाच
: मतांच्या राजकारणासाठी पोसलेली अतिक्रमणे उद्धवस्त करण्याची
आली आहे योग्य वेळ
शिवाजी भोसले
सोलापूर : सोलापूर शहरातील दाटलेली अतिक्रमण काढण्याचा अजेंडा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे राबविताहेत, साधारण 26 बेकायदा इमारतींसह अत्यंत वदर्ळीच्या विजापूर रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी आयुक्तांनी मनावर घेतलं,यासंबंधीच्या वार्तानी सोलापूरकर प्रेमी सुखावले आहेत. आयुक्तसाहेब, अतिक्रमणांनी गुदमरलेल्या सोलापूर शहराचा श्वास मोकळा करा, अतिक्रमणांवर धाडसाने बुलडोझर फिरवाच असा आग्रह सुज्ञ सोलापूरकांकडून धरला जातोय.
विशेष म्हणजे नवीन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना लडिवाळपणे गळ घालताना तमाम सोलापूरकरांसाठी एवढी मेहरबानी कराच, अतिक्रमण उद्धवस्त कराच, अतिक्रमण हटावासाठी दबावाला न झुगाराता ताकद लावालाच, आजवर मतांच्या राजकारणासाठी पर्यायाने महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी अतिक्रमणांना संरक्षण दिलं, त्यांना पोसलं आहे, त्यातून आख्ख्या शहराचं वाटोळं झालं आहे, तेव्हा स्मार्ट सिटीमधील अतिक्रमधे उद्धवस्त कराच, अशी मागणी या शहरातील तमाम सुज्ञ शहरवासियांकडून जोर धरली आहे.
सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागात अतिक्रमणे अक्षरश: बोकाळली आहेत. कुठेही पार्किंगच्या जागा राहिलेल्या नाहीत. अपार्टमेंटच्या ठिकाणी असलेल्या पार्किंगच्या जागादेखील बिल्डरांनी विकून टाकल्या आहेत. मुख्य रस्त्यावर फ्रंट मार्जिनमध्येदेखील अतिक्रमणे झाली आहेत. सोलापूर शहर अक्षरश: अतिक्रमणांनी वेढले गेले आहे. शहराच्या कोणत्या भागात कोणाचे अतिक्रमण नाही, असा प्रकारच नाही. ‘दिसेल मोकळी जागा तिथे कर अतिक्रमण’ असा फंडा या शहरात अतिक्रमणांच्याबाबतीत तत्कालीन महापौर, उपमहापौर, नगरसेवक, शिवाय महापालिकेतील काही अधिकारी यांच्या आशीवार्दाने राबला गेला. एकमेकांनी केलेली अतिक्रमणे बघता बघता आख्खा सोलापूरच अतिक्रमणाच्या विळख्यात गेल्याचे वास्तव आहे.
गाडी लावताना काळीजात होतं धस्स
सोलापूर शहरातील मुख्य बाजार पेठांच्या ठिकाणी कोठेच फोर व्हिलर, टू व्हिलर त्याहून महत्वाचे म्हणजे फोर व्हिलर लावण्याठी पार्किंगची सोय नाही. त्यामुळे महागाड्या किंमतीच्या गाड्या नेमक्या कोठे पार्किंग करुन खरेदीसाठी जायचे? याची मोठी डोकेदुखील सोलापुरात आहे. अद्यावत कोठेच पार्किंगची सोय नसल्याने गर्दीत गाड्या लावताना महागाडी गाडी घासली जाईल, ओराखडे निघतील, अन्य नुकसान होईल, मोलामाघाची गाडी खराब होईल, गाडीचे नुकसान होईल, ही भिती कायमच गाडी मालक यांच्या मनात राहते. त्यामुळे सोलापुरात गाडी कोठे लावून जायचे म्हटले की काळजात धस्सं होतं हे वास्तव आहे. आयुक्तांनी बाजार पेठेच्या परिसरात ज्या ठिकाणी पार्किंगचे आरक्षण आहे, तिथे पार्किंग करण्यासंबंधी सोय करुन देण्याच्या पार्श्वभूमीवर, मनात घ्यावं, ही वाहन मालक तसेच चालकांची मागणी आहे.
सत्तेच्या गोळ्यासाठी सगळेच निघाले एका माळेचे मणी,
पण आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्याकडून वाढल्या अपेक्षा
महापालिकेतील सत्ता हा विषय आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा राहिला. लोण्याभोवती जसं मांजर घुटमाळतं त्याप्रमाणे महापालिकेतील सत्तासाठी विरोधक आणि सत्ताधारी घुटमळत असायचे, सत्तेपुढे सोलापूरच्या विकासाचे त्यांना कोणतेच सोयरसुतक नव्हते. शहरातील अतिक्रमणांना बुलडोझर लावल्यास ज्यांची अतिक्रमणे काढली जातील, त्या संबंधितांची मते विरोधात जातील त्यांची नाराजी महापालिकेत आपली सत्ता आणताना भोवू शकते. त्यामुळे ज्या ज्या वेळी शहरातील अतिक्रमणे उद्धवस्त करण्याचा विषय आला, त्या त्या प्रत्येकवेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी सत्तेच्या सोईसाठी पर्यायाने महापालिकेतील सत्तेच्या लोण्याच्या गोळ्यासाठी अतिक्रमणे काढणे हा विषय बाजूला केला. तिथेच अतिक्रमणधारकांचे फावले. अतिक्रमणे काढली जात नाहीत, असा गोड समज करुन घेण्यात आला, बहुतांशजणांनी अतिक्रमणे केली त्यातून शहर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलं. मात्र आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी धडाकेबाजपणा दाखविला तर शहर अतिक्रमणमुक्त होईल, नवा इतिहास घडेल. सोलापूरकर आयुक्तांना डोक्यावर घेऊन अक्षरश: नाचतील पण आयुक्तांनी ते करायला हवं,हे मात्र नक्कीच.
आयुक्तांना मोठी संधी,
हस्तक्षेपच नाही राहणार
महापालिकेत सध्या कारभारी म्हणून विश्वस्त नाहीत. प्रशासकराज आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी सोलापुरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यास कारभार्यांचा हस्तक्षेप अजिबात आड येणार नाही. हस्तक्षेपाशिवाय सगळी अतिक्रमणे उद्धवस्त करता येतील. आयुक्तांना सोलापूर अतिक्रमणमुक्त करण्याची नामी संधी आहे, नाव करण्याची योग्य वेळ आहे, शहरवासियांना दिलास देण्याचे करेक्ट टाईमिंग आहे.
संचारबंदीत साधला होता मोका;
प्रशासकराज आहे तोपर्यंत आताही साधता येईल मोका
सोलापुरातील संचारबंदी लागू होती. या शहराचे पोलीस आयुक्त अशोक कामटे हे होते. त्यावेळी शहरातील मोकाच्या ठिकाणची अतिक्रमणे उद्धवस्त करण्यात आली होती. ज्या ज्या ठिकाणीची बेकायदा बांधकामे काढली त्या त्या ठिकाणी मोकळा श्वास घेणं सोपं झालं होतं.
गुडेवारांना रोखले,
मोहीम राहिली अर्ध्यावरच
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापुरातील अतिक्रमणे पूर्णपणे उद्धवस्त करण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी त्यांनी मोहिमदेखील राबवायला सुरुवात केली होती. होटगी रोड आणि विजापूर रस्त्यावरील फ्रंट मार्जिंनमधील काही अतिक्रमणांवर त्यांनी बुलडोझर फिरवायला सुरुवात केली होती, याच टप्यावर त्यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींसह मंत्रालयातून दबाव आणला गेला. त्यांचा शेवटी नाईलाज झाली. त्यामुळे त्यांनी सुरु केलेली मोहीम अर्ध्यावरच राहिली.
आयुक्त डॉ.ओम्बासेंवर येऊ शकतो दबाव,
मात्र लोकप्रतिनिधींनी पहावे सोलापूरचे हित
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे हे सोलापुरातील अतिक्रमणं उद्धवस्त करण्यासाठी सज्ज होताहेत, हे कळल्यापासूनच त्यांना अतिक्रमण उद्धवस्त करण्यापासून कसे रोखायचे? याचे प्लॅनिंग शहरात मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलेल्या अतिक्रमणधारकांनी सुरु केलं आहे. स्थानिक खासदार, आमदार यांच्याकडून आयुक्तांकडून अतिक्रमणे उद्धवस्त करण्याची सुरु करण्यात येणारी मोहीम थांबविली जाऊ शकते. प्रसंगी मंत्रालयातून त्यांच्यावर दबाव आणला जावू शकतो. अतिक्रमणे उद्धवस्त करण्यासंदर्भात ‘दबावाचा गुडेवार पॅटर्न’ राबू शकतो. मात्र सोलापूर शहराची अतिक्रमणांमुळे जी वाईट अवस्था आहे, ती पाहता स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोहीम रोखण्याऐवजी, आयुक्तांच्या धडाकेबाज मोहिमेला साथ द्यायला हवी.
भविष्यात निवडणुका त्यामुळे वेगळ्या हालचाली होणारच
ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायायलात दाखल याचिकेवर सुनावणी होऊन येत्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक लागू शकते. महापालिकेतील सत्तेपासून अनेक वर्षे बाजूला राहावे लागल्याने इथल्या सत्तेसाठी सर्वच प्रमुख पक्ष हापापले आहेत. पाण्याबाहेर काढल्यावर माशाची स्थिती जशी होते, तो ज्याप्रमाणे तडफडतो, त्याप्रमाणे महापालितेतील सत्तेला आजवर चिटकून राहिलेल्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे अतिक्रमणे काढली तर महापालिकेतील निवडणुकीवेळी मतदारांची नाराजी नको, आम्हीच अतिक्रमणे काढू दिली नाहीत, आम्हीच अतिक्रमणे वाचवली असा मेसेज पोचवून शहरवासियांच्या मते आपल्या बाजूने खेचली जावीत यासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेला सत्तधारी भाजप पर्यायाने महायुतीकडून ‘खो’घातला जावू शकतो.