अहिल्यानगर, 28 जून (हिं.स.)।
दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. हा व्यवसाय मोठा कष्टाचा आहे. संगमनेर तालुक्यामध्ये सुमारे 9 लाख लिटर दूध उत्पादन होत असून या व्यवसाया मध्ये महिलांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
आंबीखालसा येथील मुळेश्वर महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेचा २५ वा रौप्य महोत्सव सोहळा निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख हे होते.
याप्रसंगी सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या महिलांचा सत्कार माजी मंत्री बाळा साहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बोलताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका होता मात्र स्वतःच्या विकास कामां मधून तालुक्याचा राज्यात लौकिक निर्माण झाला आहे. सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. राजहंस दूध संघ हा सहकारातील उत्कृष्ट दूध संघ आहे. सहकारी दूध संघांमुळे खाजगी दूध भाव देत आहेत. तालुक्यात दूध व्यवसाय मोठा असून दररोज सुमारे 9 लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. हा मोठा कष्टाचा व्यवसाय आहे. यामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे.
तर, रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम शेतकरी व दूध उत्पादक यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. दूध संघाने सातत्याने नवनवीन योजना राबवले असून मुरघास व एमडीएफ गोठा ही संगमनेरची संकल्पना राज्यामध्ये मॉडेल ठरली आहे. गुणवत्ता पूर्ण दूध उत्पादन करताना सर्व गाव पातळीवरील संस्थांनी ही आपला लौकिक टिकवला असून हा सहकार जपण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले.
तर, अजय फटांगरे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या सहकारामुळे संगमनेरच्या सहकारा चा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. हा गौरव संगमनेर तालुक्यासाठी गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले.