तेहरान , 16 जून (हिं.स.)।इस्रायल- इराण संघर्षादरम्यान सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. आमची मुले तिथे सुरक्षित नाहीत. सरकारने त्यांना बाहेर काढावे, असे आवाहन पालकांनी केले आहे. याचबरोबर इराक आणि पाकिस्तानने त्यांची मुले इराणमधून बाहेर काढली आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.यानंतर आता इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू करणार आहे
या युद्धात १५०० भारतीय विद्यार्थी अडकले असल्याचे काश्मीरच्या रेहाना अख्तर हिने म्हटले आहे. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे काश्मीरचे आहेत. दुसरीकडे इस्रायलमध्येही हमासपेक्षाही जास्त भयावह स्थिती आहे. केरळचा सूरज रंजन हा विद्यार्थी तिथे शिकत आहे. त्याने यावेळी परिस्थिती सर्वात भयानक आहे, असे म्हटले आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू करणार आहे. ‘भारतीयांसह परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात सुरक्षितपणे पाठवले जाईल’, असं इराण सरकारने म्हटले आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून बाहेर काढले जाईल.
दरम्यान, इस्रायलने १५ जूनला दुपारी हजत दोस्त अली हॉस्टेलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन भारतीय विद्यार्थी जखमी झाले. हे दोन्ही विद्यार्थी जम्मू आणि काश्मीरचे आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना रामसर येथे हलवले आहे. या घटनेमुळे इराणमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी इराणसोबत चर्चा करत आहेत.
—————