पुणे , 18 जून (हिं.स.)।संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची आषाढी वारी सुरक्षित आणि सुशोभित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठ्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. त्यानुसार, यंदाच्या आषाढी वारीत साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे. यामध्ये गर्दीमध्ये साध्या वेशातील आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलिस वारीत सहभागी होणार आहेत.
देहू येथून बुधवारी (दि. १८) संत तुकाराम महाराज पालखी, तर आळंदी येथून गुरुवारी (दि. १९) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही दिवशी पालखी मार्गावरील वाहतूक, पार्किंग, गर्दी नियंत्रण, वारकऱ्यांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठ्या फौजफाट्यासह बंदोबस्त आखला असून त्यामध्ये पोलिस सहआयुक्त, अपर आयुक्त, सहा उपायुक्त, ११ सहायक आयुक्त, ६१ निरीक्षक, १७२ उपनिरीक्षक, २६३४ अंमलदार, ८०० होमगार्ड, तीन एसआरपीएफ कंपनी, चार बीडीडीएस पथक, तीन रॅपिड कंट्रोल पथक (आसीपी), १२ स्ट्रायकिंग फोर्स यांचा समावेश असणार आहे. देहू आणि आळंदी येथे तसेच पालखी मार्गांवर ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले आहेत. त्यावरून सोहळ्यावर ‘वाॅच’ ठेवण्यात येणार आहे. वारीदरम्यान, चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून गर्दीमध्ये साध्या वेशातील आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलिस वारीत सहभागी होणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे.
देहू आणि आळंदी येथील पालखी सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला असून डायल ११२ या हेल्पलाइनवरूनही तत्काळ पोलिस मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे. तसेच परराज्यातील तसेच परजिल्ह्यातून सराईत सोनसाखळी चोर तसेच पाकीटमार वारीत येतात. अशा चोरट्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्यभरातील पोलिसांची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे अशा चोरट्यांची ओळख पटवणे सहज शक्य होत असून, त्यांच्यावर ‘वाॅच’ राहणार आहे.