जम्मू, 09 मे (हिं.स.) : जम्मूमधील सांबा सेक्टरमधून गुरुवारी रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 7 दहशतवादी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कारवाईत ठार झाले आहेत. याबाबत बीएसएफने एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
या कारवाईदरम्यान, बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सच्या सीमा चौकीचे मोठे नुकसान केले, जिथून या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार करण्यात येत होता. जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये, 8 आणि 9 मे च्या मध्यरात्री, दहशतवाद्यांच्या एका गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी रेंजर्सच्या चौकीतून गोळीबार करण्यात आला. परंतु बीएसएफच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न निष्फळ ठरवत किमान 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.
तत्पूर्वी काल रात्री, पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-70 तोफा, जेयू-23 एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य सडेतोड प्रत्युत्तर देत आहे.—————————–