इस्लामाबाद : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हिंसेचे थैमान घातले होते. या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा मास्टरमाईंड झकी-उर-रेहमान लखवी याला पाकिस्तानमध्ये अटक केली आहे. लखवीवर दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव वाढू लागल्यामुळे पाकिस्तानने लखवी विरोधात कारवाई केली आहे.
जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला. लखवीला लाहोरमधून अटक करण्यात आली. दवाखान्याच्या नावाखाली मिळणारा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोप लखवीवर आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं लखवीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी घोषित केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (FATF) काळ्या यादीत समावेश होऊ नये यासाठी पाकिस्तानकडून विविध क्लृप्या वापरल्या जातात. आपण दहशतवाद्यांविरोधात कारवाया करत असल्याचा देखावा पाकिस्तानकडून उभा केला जातो. याआधी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या एफआयएनं मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या ११ जणांचा समावेश केला होता.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबानं मुंबईतील अनेक ठिकाणांवर दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांमागे पाकिस्तानचं लष्कर आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दीडशेहून अधिक जण मृत्यूमुखी पडले. यामध्ये परदेशी नागरिकांचादेखील समावेश होता. जकी-उर-रहमान लखवी या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.