मनसे सकारात्मक आणि सावधही
मुंबई, 6 जून (हिं.स.) – ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल’, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी केले. मूळच्या शिवसैनिक मात्र मध्यंतरी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. तसेच मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनीही शिवबंधन हाती बांधले. मातोश्रीवर हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल? यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ.
ठाकरे म्हणाले की, सुजाता ताईंनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या. त्या शिवसेना सोडणार हे ऐकून धक्का बसला. वाईट वाटलं. ठिक आहे. तो इतिहास झाला आहे. तिथे बेबंदशाही पाहिली. कशासाठी लोक तिकडे जात आहेत हे तुम्ही जवळून पाहिलं. तिथे तुम्ही कुणाशी जुळून घ्याल असं वाटत नव्हतं. वातावरण विचित्र होतं. काही जण तिकडे जातात. तिकडे गेल्यावर काहींना पश्चात्ताप होतो. पण तुम्ही जे धाडस आणि हिंमत दाखवली ते फार कमी लोकांमध्ये आहे. लाचारांमध्ये धाडस राहत नाही. तुम्ही अनुभव संपन्न झाला आहात. तुम्ही आणखी जोरात काम कराल.मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर केली जाऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पावले उचचली आहेत. वैभव दळवींचा पक्षप्रवेश हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.
अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पोहोचले. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वैभव दळवी यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मनसेतून आलेल्या वैभव दळवी यांच्या हाती शिवबंधन बांधले. वैभव दळवी हे मनसेचे अंधेरी पूर्वचे पदाधिकारी होते. काही दिवसांपासून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या समर्थकांसह उद्धवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे अनिल परब आणि इतर प्रमुख नेते हजर होते.
मनसेची सावध भूमिका
दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-मनसे युती संदर्भात सकारात्मक असल्याचे एकदा म्हटले. मात्र कालांतराने शिवसेना-मनसे संदर्भातील निर्णय राज ठाकरे घेत असतात. यासंदर्भात कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचं तोंड दुधाने पोळलं गेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कोणताही ठोस प्रस्ताव राज ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही, तोवर आम्ही निर्णय घेणार नाही. ज्यावेळेला येईल, त्यावेळी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील, अशी सावध भूमिकाही घेतली. २०१४ आणि २०१७ मधील घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. ज्यावेळी आपण युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा म्हणजेच २०१४ रोजी बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. पण सुभाष देसाईंना ते भेटले, तेव्हा राज ठाकरेंना युती करायची आहे, असं त्यांना कळवलं होतं. याला म्हणतात प्रस्ताव. असा कोणताही प्रस्ताव आता आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे त्यावर राज ठाकरेंनी कसा निर्णय घ्यायचा आहे?, असा प्रश्नही देशपांडे यांनी विचारला.
वैभव दळवी यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर देशपांडे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना त्यांचे पदाधिकारी फसवत आहेत. उद्धव ठाकरे यांना बरे वाटावे म्हणून मनसेचा पदाधिकारी फोडला, असे सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून क्रॉस चेक करून घ्यावे. हा आमचा पदाधिकारी नाही. २०१४ ला हा आमचा पदाधिकारी होता. त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. २०१४ ते २०२५ या कालावधीत तो ना मनसेच्या बॅनरवर आहे, ना आमच्या कोणत्या पदाचे पत्र त्याला गेले आहे. उलटपक्षी तो थोडासा बदनाम व्यक्ती आहे. त्याच्यावर ३५४ सारख्या केसेस आहेत. तो आमचा पदाधिकारी नाही. तरी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून चेक करून घ्यावे, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केलेे.
…तर राज ठाकरे एक पाऊल पुढे येतील – अविनाश जाधव
दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, अख्खी शिवसेना म्हणत असेल की, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जायला हवं, तर उद्धव ठाकरेंकडून एक कॉल यावा, अशी अपेक्षा आहे. कॅमेऱ्यासमोर बोलणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलावं. एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावलं पुढे येतील, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे. जोपर्यंत त्यांच्याकडून काहीही ठोस येत नाही, तोवर आम्ही पुढे कसं जाणार? असा प्रश्नही जाधव यांनी विचारला.