सोलापूर, 30 जून (हिं.स.)।
पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी यंदा १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये येतील, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात दीड ते दोन लाख भाविक मावतात, पण नदी पात्रात पाण्याचा विसर्ग १५ ते २० हजार क्युसेकपर्यंत राहिल्यास वाळवंटात वारकऱ्यांना थांबता येणार नाही. त्यामुळे उजनीतून भीमेत सोडलेला विसर्ग १ जुलैपासून पाच हजार क्युसेक केला जाणार आहे. तर, वीर धरणातून सोडलेला विसर्ग २ जुलैपासून पूर्णपणे बंद केला जाणार आहे.
आषाढी वारीचा सोहळा ६ जुलै रोजी पंढरीत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त, जिल्हा प्रशासनाने आरोग्य व्यवस्था, दर्शनरांग अशा सर्व बाबींचे नियोजन केले आहे. पण, चंद्रभागा नदीतील विसर्ग सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीपण सध्या उजनीत १० हजार आणि वीर धरणात सात हजार क्युसेकची आवक सुरू आहे. जुलैअखेर दोन्ही धरणांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणी असणे अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या वरून येणारा विसर्ग पाहून दोन्ही धरणांतून नद्यांद्वारे अतिरिक्त पाणी सोडून दिले जात आहे. परंतु, आषाढी वारी काळात चंद्रभागा नदीत पाच हजारापेक्षा जास्त विसर्ग राहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाकडून घेतली जात आहे.
ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आता १ व २ जुलैपासून केली जाणार असून, विसर्ग कमी केल्यामुळे चंद्रभागा नदी पात्रातील पूरस्थिती टळणार आहे.