बंगळूरू , 6 जून (हिं.स.)।बंगळूरूमध्ये आरसीबी संघाच्या विजयी परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ जणांनी आपला जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले.या प्रकरणी आता कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करत आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात रायल चॅलेंज बंगळूरु (आरसीबी), कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) संस्था आणि ‘कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन’च्या (केएससीए) प्रतिनिधींच्या अटकेचे निर्देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी(दि.६) मोठी कारवाई करत आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते असंही समोर आलं आहे. मात्र केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली. आता पोलीस चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत निखिल यांची चौकशी करत आहेत. चेंगराचेंगरी प्रकरणात त्यांची भूमिका काय होती हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएचे सुनील मॅथ्यू आणि किरण कुमार यांचाही समावेश आहे. हे दोघेही डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्समध्ये काम करतात.
या चेंगराचेंगरी प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत. त्याशिवाय कर्नाटक सरकारने या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांसह इतर बड्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मोठी कारवाई केली आहे. बंगळुरूतील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्या. माइकल कुन्नाह यांच्या नेतृत्वावाली तपास आयोग स्थापन केला आहे.न्या. कुन्नाह या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार आहेत. या प्रकारणात पोलिसांनी गुरुवारी(दि.५) आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी व कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सरकारने या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. कब्बन पार्क एसीपी, सेंट्रल झोन डीसीपी, अतिरिक्त पोलीस आयुक्त वेस्ट झोन, बंगळुरू पोलीस आयुक्त, स्टेशन हाऊस मास्टर, कब्बन पार्क पोलीस निरीक्षक यांचा समावेश असून या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणुकीची घोषणा केली. पोलिसांनी नकार दिल्यानंतरही सोशल मीडियावरून पोस्ट हटवण्यात आली नाही, ज्यामुळे हजारो चाहत्यांची दिशाभूल झाली. त्यांनी दावा केला की, गेट ९ आणि १० जवळ दुपारी १ वाजता मोफत तिकिटे वाटली जातील, परंतु तसं झालं नाही, ज्यामुळे गर्दी जमली. दुसऱ्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, स्टेडियममध्ये दुपारी ३ वाजता एन्ट्री सुरू होईल, ज्यामुळे गोंधळ आणखी वाढला आणि चेंगराचेंगरी घटना घडली.