मुंबई : आताच महिन्यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून या प्रकरणी आपण निवडणूक आयोग आणि मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील पाच हजार कोऱ्या मतपत्रिका तेथे सापडल्या आहेत. पुण्यातही अगदी शेवटच्या तासात 137 ते 157 मते नोंदवली गेली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिग मशिनवर हे मतदान घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सहा जागांपैकी पाच जागा भाजपने गमावल्या असून त्यांच्या हक्काच्या नागपूर आणि पुणे मतदार संघातही भाजपला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
साधारणपणे एक मत नोंदवताना तीन मिनिटांचा कालावधी लागतो, असा जर हिशोब लक्षात घेतला जर तासाला जेमतेम 20 मते नोंदवली जाऊ शकतात पण तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात कसे मतदान एका तासात नोंदवले गेले, असा आक्षेप त्यांनी घेतला आहे.
पुण्यातील काही मतदारांना जाणिवपूर्वक त्यांच्या राहत्या घरापासून दुरच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यास भाग पाडले गेले, असेही त्यांचे म्हणणे होते. पदवीधर मतदार संघात आठवी पास मतदारांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झाल्याचे आढळून आल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.