सोलापूर, 29 मे (हिं.स.)।
भारतीय जनता पक्ष हा ‘केडर बेस्ड’ राजकीय पक्ष. त्यामुळे कार्यकर्ता हा पक्षाची ताकद. मधली अडीच वर्षे वगळली तर साडेसात वर्षांपासून भाजप राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे पक्षासह सरकारकडून ‘बळ’ मिळावे, ही पदाधिकारी – कार्यकर्त्यांची अपेक्षा साहजिक आहे. मात्र, म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तशीच स्थिती सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या ‘केडर’ची झाली आहे. पदाधिकारी – कार्यकर्त्यांत पक्षाच्या लोकप्रतिनिधी व सरकार विरोधात खदखद आहे.
भारतीय जनता पक्ष ही विशिष्ट तत्त्वांवर बांधलेली संघटना आहे. पक्षात कार्यकर्ता सोडा शहर – जिल्हा पदाधिकारी आणि प्रदेश यांच्यात संवाद नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संघटनमंत्री पदासाठी संघातून भाजपला कार्यकर्ता दिला जायचा. कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष आणि सरकारपर्यंत पोचवल्या जायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ”हायकमांड”ने पक्षावर आपलीच ”कमांड” रहावी, यासाठी आपल्या मर्जीतील व्यक्तीला त्या पदावर बसवले. नंतर पक्षाची ती ”समन्वय”ची परंपराच मोडीत काढली. तीच भावना जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांपर्यंत झिरपली आहे. पक्षावर आपली ”कमांड” राखण्यासाठी कुरघोड्या सुरू आहेत. शहरातील मंडल अध्यक्षासह शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीच्या राजकारणातून ही बाब पुढे आली आहे. विभाग संघटक असले तरी प्रभावशाली कार्य नाही. परिणामी कार्यकर्त्यांना शरद कुलकर्णी, विजय पुराणिक यांच्या आठवणीत रमावे लागत आहे.