□ लम्पी संसर्गामुळे दिंडींसोबत येणाऱ्या बैलजोडीची करावी तपासणी
□ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत नदीपात्रात अर्थात चंद्रभागेत पाणी सोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. Plan for release of water in Chandrabhaga for Kartiki Yatra Lumpy infection Bullock inspection
वारकरी सांप्रदाच्या प्रथा परंपरेप्रमाणे चंद्रभागा वाळवंटात भजन व किर्तन करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शुध्द नवमी ते शुध्द पोर्णिमेपर्यंत तंबू आणि मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंट भजन, किर्तनासाठी रिकामे राहील याची दक्षता घेवून पाणी सोडण्याबातचे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविक स्नानासाठी जातात तेथे पाणीपातळी बाबतचे सूचना फलक लावावेत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयी-सुविधासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हा अधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक नितीन धार्मिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, भीमा पाटबंधारे विभागाचे महेश चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरेप्रमाणे चंद्रभागा वाळवंटात भजन व किर्तन करण्यासाठी महावितरणने आवश्यक तात्पुरती वीज जोडणी देण्याबाबतचे नियोजन करावे. नगरपालिकेने चंद्रभागा वाळवंट व नदीपात्र स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. नदी पात्रातील घाटावर आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करावे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा. शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक माहिती फलक लावावेत. 65 एकर मधील दिंड्यांना प्लॉटचे वाटप करण्यासाठी नियोजन करावे.
तसेच तेथे मुबलक प्रमाणात पाणी, स्वच्छता राहिल याची दक्षता घ्यावी. अतिक्रमण काढण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन करावे. तसेच मंदिर समितीने पत्राशेड, स्काय वॉकचे संरचनात्म परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करुन घ्यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.
कार्तिकी यात्रेसाठी राज्यातील इतर जिल्ह्यातूनच दिंड्या काही प्रमाणात येतात. दिंडीतील पालखीच्या रथासाठी बैलजोडी येत असतात. सध्या राज्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव असल्याने दिंडींसोबत येणाऱ्या बैलजोडीच्या आरोग्याची तपासणी पशुवैद्यकीय विभागाने करावी. यासाठी विविध ठिकाणी पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी.
![]()
फिरते वैद्यकीय पथक व औषधसाठा मुबलक उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. बांधकाम विभागाने आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती व तात्पुरेते हेलीपॅड करण्याबाबत नियोजन करावे. अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, प्रसादाची दुकाने येथील खाद्यपदार्थ विक्री तसेच दुध डेअरीची तपासणी करावी. एस.टी महामंडळ व रेल्वे विभागाने स्थानकावर स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी तसेच प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. तसेच यात्रा कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी माहिती दिली. नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ऊसदर आंदोलन भरकटले; जिल्ह्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याच्या ट्रॅक्टरची बारा टायर फोडले
पंढरपूर : शेतक-याच्या उसाला घामाचे दाम योग्य मिळावे यासाठी स्थापन झालेल्या ऊस दर संघर्ष समितीचे आंदोलन भरकटल्याचे आज पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याच्या ट्रॅक्टरचे टायर फोडल्यानी तसे बोलले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देणाऱ्या श्री सुधाकरपंत पांडुरंग साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची 12 टायर अज्ञात व्यक्तीने धारधार सुरा वापरून फोडली आहेत. वाखरी तालुका पंढरपूर येथील थोरात पेट्रोल पंपाच्या समोर ही घटना घडली आहे.
ऊस दर संघर्ष समितीमध्ये गुन्हेगारी वृत्तीचे काहीजण शिरल्यामुळे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता होती. त्यानुसार धारधार सुरा किंवा शस्त्राने ट्रॅकरची 12 टायर फोडली असून वाहन मालकाचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
![]()
चळे येथून सुधकारपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्यावर जाणारे वाहन थोरात पेट्रोल पंप वाखरी येथे अडवून शेतकरी आणि वाहन मालकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. मुळात पांडुरंग साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देतो, अश्या कारखान्याची वाहतूक अडवण्याचा काय हेतू आहे? शेतकऱ्यांचे आणि शेतकरी संघटनेचे आंदोलन कोणाला हिंसक करायचे आहे? या आंदोलनातुन गुन्हेगारी वृत्तीचे लोक पुढे येत आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
येणाऱ्या काळात शेतकरी संघटनांना याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. नाहीतर त्यांना हिंसक आंदोलनाची जबाबदारी स्वीकारावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
