अमरावती, 11 जून (हिं.स.)। गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनियमिततेच्या मुद्द्यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाला घेरले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी हा निवडणूक आयोग नसून तो भाजपचाच आयोग असल्याची टीका केली आहे. एवढेच नव्हे तर सक्रीय निषेध व्यक्त करण्यासाठी आगामी १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता अमरावतीत मशाल मोर्चाचीही घोषणा केली.
या मोर्चाच्या माध्यमातून दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना पाठविले जाणार आहे. माध्यमांशी संवाद करताना देशमुख म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत गंभीर अनियमितता झाली आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हा निवडणूक घोटाळा पुराव्यांसह उघड केला आहे. परंतु आयोगाने त्यावर उत्तर दिले नसून भाजपचेच पुढारी पुढे येऊन स्पष्टीकरण देत आहेत. यावरुन त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचेच अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले आहे. दरम्यान हा घोटाळा यापुढच्या निवडणुकांमध्ये होऊ नये तसेच दोषींवर कारवाई केली जावी, म्हणून काँग्रेसने १४ जूनच्या आंदोलनाची आखणी केली आहे.
देशमुख यांच्यामते जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सोपवून या मोर्चाचा प्रारंभ होणार असून इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या आंदोलनाचा समारोप केला जाणार आहे. त्यांच्यामते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या मतमोजणी प्रक्रियेत अनेक संशयास्पद बाबी झाल्या आहेत.
मतदार यादीतील तांत्रिक चुका, ईव्हीएममध्ये हस्तक्षेप आदी मुद्द्यांमुळे निवडणूक आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने वेळोवेळी यावर आक्षेपही नोंदवले आहेत, पण अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून आगामी शनिवारचा मोर्चा हा त्याचाच एक भाग आहे. यावेळी खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, माजी संचालक संजय मार्डीकर-वानखडे, सेवादलाचे प्रदीप देशमुख, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी संजय बेलोकार आदी उपस्थित होते.