अमरावती : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर आंदोलनासाठी निघालेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’ असं फडणवीस म्हणाले.
पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्त कार्यालयात नेलं आहे. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू न देणं म्हणजे लोकशाहीची हत्या, असा घणाघाती आरोप राणा दाम्पत्यानं केला आहे.
* महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा कोर्टानं जामीन मजूर केला. रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मातोश्रीवर आंदोलनाचा इशारा
तुरुंगातून बाहेर येताच आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं होतं. राज्य सरकारवरही त्यांनी गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचं आमदार राणा यांनी म्हटलं आहे. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी (16 नोव्हेंबर) ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
* मुख्यमंत्री ठाकरेंचा पुतळा जाळला
अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या रविवारी नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. सरकार विरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत आंदोलन केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या अटकेबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.