अमरावती, 29 मे (हिं.स.)
शेतात सातत्याने रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. दरवर्षी उत्पादनात घट होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता टिकाव धरत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकरी शेणखताकडे वळलेला दिसत आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचे वाढीव दर लक्षात घेता शेतकरी घरच्याच शेणखताला अधिक महत्त्व देत आहेत. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो. मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील माधान शेत शिवारात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतात शेणखत पसरविण्याच्या कामात व्यस्त आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट होत असते. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसते. शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय, गांडूळ, शेणखत व जैविक खताचा वापर केला जातो. पाळीव जनावरांच्या शेणापासून तयार झालेले खत जमिनीच्या सुपीकतेसाठी बरेच फायदेशीर असते. सध्या शेतशिवारात बैलबंडी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात शेणखत टाकणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शेणखताला सोन्याचा भाव
शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतात शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेणखताची गरज आहे. जनावरांची संख्याही कमी झाली आहे.