अमरावती, 28 मे (हिं.स.)
शहरातील इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या मुलांचे कॉटन मार्केट रस्त्यावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. मंगळवारीऔ प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागावर धडक देत प्रादेशिक उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या निकाली काढाव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या गैरसोयी संदर्भातील तक्रार तेथील विद्यार्थ्यांकडून प्रहारला मिळाली होती. वसतीगृहाच्या एका खोलीत ८ ते १० विद्यार्थी राहतात, खोलीत हवा यायला आवश्यक खिडक्या नाहीत. एकाही खोलीत कूलर नाही. पावसामुळे खोलीची आणि बाथरूमची सीलिंग गळते. पावसाचे पाणी पाइपद्वारे खाली येऊन खोलीत घुसत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून खोलीत घुसलेले पाणी बाहेर काढावे लागत आहे. त्यांना झोपायलाही जागा राहत नाही. यासारख्या अनेक समस्या विद्यार्थ्यांना असल्याचे प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी सांगितले आहे. संबंधित विभागाला वारंवार निवेदने दिली मात्र, त्यांच्या एकाही समस्येचे निवारण झाले नाही. दरम्यान प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली असता तेथील विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू यांनी दिला आहे.
या आहेत वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्या
विद्यार्थ्यांची इमारत बदलावी, जीआरमधील सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्या, अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी. ड्रेनेज सिस्टिमची व्यवस्था करावी. इमारतीचे व्हेंटिलेशन बरोबर करावे, वसतीगृहाच्या इमारत परिसरातील ध्वनिप्रदूषणावर पर्यायी मार्ग काढावा. पावसाचे पाणी साचल्याने विविध आजार होत आहेत यावर तत्काळ उपाययोजना करावी, पार्किंग व्यवस्था करण्यात यावी.