अमरावती, 29 मे (हिं.स.)
राज्यात पहिल्यांदाच अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेकडोच्या वर महाविद्यालयांनी यासाठी नोंदणी केली आहे. बुधवार, २१ मे पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवर प्रवेशाच्या अनुषंगाने नोंदणी केली नाही त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. २१ मेपासून ३ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. या दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंती नोंदविणे गरजेचे आहे. त्यात व्यवस्थापन कोटा, इन हाऊस आणि अल्पसंख्याक अर्ज करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणी होणार नाही. तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित होणार असून त्यानंतर हरकती आणि दुरुस्ती प्रक्रिया चालणार आहे. राज्यात प्रथमच इयत्ता अकरावीसाठी ऑनलाइन पद्धतचा अवलंब होत आहे. पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड नोंदणी झाल्याने नोंदणीचा अवधी ३ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा काल करण्यात आली.
पसंतीक्रमानुसार प्रवेश
प्रवेशासाठी नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
अनेकांनी मोठ-मोठ्या इन्स्टिट्यूट सुरू केल्या असून एखाद्या कॉलेजशी टायअप करत असतात. मात्र, आता प्रवेशाला ब्रेक लागणार आहे. यापूर्वी थेट अकरावीत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेत होते. परंतु, यावर्षीपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असल्याने शाळा तसेच विद्यार्थी व पालकांची डोकेदुखी वाढली आहे, हेही तितकीच बाब सध्यातरी दिसून येत आहे.