पुदुचेरी, 17 जून (हिं.स.) –
आपल्याला डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या स्वरूपात मानवी संसाधनांची,अधिक निदान केंद्रांची, अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. औषधांसाठी दुकाने तसेच सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्रे वाढवायची आहेत. यालाच आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी म्हणता येईल, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
पुदुचेरी येथील जेआयपीएमईआरच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्याचे महत्त्व सांगितले.
ते ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सांगताना ते म्हणाले, “जगातील सर्वात शांतताप्रिय राष्ट्राला जे कधीही विस्तारवादात सहभागी झालेले नाही त्याला भयावह दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. पंतप्रधानांनी राष्ट्राला वचन दिले: दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही. हे पंतप्रधानांचे वचन खरे केल्याबद्दल मी आपल्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो, कारण मुरीदके आणि बहावलपूर आपल्या ब्रह्मोसच्या सामर्थ्याचे साक्षीदार आहेत. संरक्षण साहित्याचे स्वदेशी उत्पादन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे याची जाणीव जगाला झाली आहे.”
“कोणत्याही प्रगतीसाठी शांतता आवश्यक असून ही शांतता ताकद असेल तर मिळते. आपण युद्धासाठी नेहमीच सज्ज असणे ही शांततेची सर्वोत्तम हमी आहे आणि ती तेव्हाच मिळते जेव्हा राष्ट्रीय मानसिकता- राष्ट्र प्रथम ही असते “असेही ते म्हणाले.
बहुपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या अलीकडच्या निर्णयाचे धनखड यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष आणि हितसंबंधांच्या पलीकडे आहेत. पंतप्रधानांनी परदेशात संसद सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा दूरदर्शीपणा दाखवला, देशात आणि बाहेर या शिष्टमंडळाला योग्य प्रतिसाद मिळाला याचा मला आनंद आहे. सर्व राजकीय पक्ष त्यानिमित्ताने एकजूट झाले. राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय विकासासाठी आपल्याला हे कायम आवश्यक आहे.”
—————