जळगाव, 24 मार्च (हिं.स.) दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वरणगावजवळील विल्हाळा शिवारात उघडकीस आली आहे. आरोपी पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.
विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ (जि. बीड) येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर हे कुटुंबासह कामासाठी आले होते. त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेखही चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरातील पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते. अजीज सलीम शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो रोज रात्री पत्नीशी भांडण करीत असे. दारूच्या नशेत तो घरी आल्यावर पत्नी सना (वय २५) हिला शिवीगाळ करू लागला.
शेजारी असलेल्या सासूने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. जेवणाचा आग्रह केल्यानंतर अजीज व सना आपल्या मुलांसह खोलीत झोपायला गेले. पहाटे कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडताच सासू आणि इतर मजुरांनी पाहिले तेव्हा सना ही रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याचे आढळले. तिच्या डोळ्या आणि नाकातून रक्त येत होते. तसेच गळ्यावर व्रण असल्याने गळा आवळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सना शेख हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, गळा दाबल्याचा संशय असल्याने शवविच्छेदन अहवालानंतर हत्या कशी घडली याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर पती अजीज शेख फरार झाला असून त्याच्यावरच पत्नीच्या हत्येचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी मृत सना हिचा भाऊ अजहर नियाजउद्दीन शेख मन्सूर याच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अजीज सलीम शेख याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच सह पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पो.कॉ. सुकराम सावकारे, मनोहर बनसोडे, भुषण माळी, साहेबराव कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वैद्यकीय तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबनराव अव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.