जम्मू, 24 मे (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्यांची लोकांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी नागरिकांना राहुल गांधींना राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या समस्या मांडण्याची विनंती केली.
पूंछ दौऱ्याबद्दल राहुल गांधी म्हणाले की , ‘ही एक मोठी दुर्घटना होती आणि त्यात अनेक लोकांचे प्राण गेले. खूप मोठे नुकसान झाले आहे. मी लोकांशी बोललो आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याची विनंती केली आहे. आपण त्यांची इच्छा नक्की पूर्ण करू अशी ग्वाही राहुल यांनी दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये माहिती देताना सांगितले होते की, राहुल गांधी 24 मे रोजी पूंछला भेट देतील. यावेळी ते अलिकडच्या पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित कुटुंबांना भेटतील. यापूर्वी, त्यांनी 25 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यातील जखमींची भेट घेतली होती.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी राहुल गांधींच्या दौऱ्याची माहिती दिली होती. राज्य सरकार लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले होते. जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या आणि तक्रारी ऐकाव्या तसेच त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करावा हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. ‘जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्हे पाकिस्तानसोबतच्या अलिकडच्या संघर्षामुळे प्रभावित झाले आहेत.’ पाकिस्तानने सीमेपलीकडून विनाकारण गोळीबार केला, ज्यामुळे स्थानिक लोकांच्या घरांचे नुकसान झाले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे
