कोलकाता , 30 एप्रिल (हिं.स.)।कोलकातामधील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची भयंकर घटना घडली आहे.यामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवारी(दि.२९) रात्री मध्य कोलकातामधील फलपट्टी मछुआ परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये घडली.कोलकाताचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी(दि.२९) रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीत सापडून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, अनेक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, असे वर्मा यांनी सांगितले. जेव्हा ही आग लागल्याची घटना घडली. तेव्हा हॉटेलमध्ये ६० लोक होते. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ११ पुरुष आहेत, एक महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. आगीत मृत्यू झालेल्यांपैकी ८ जणांची ओळख पटली आहे. या घटनेत १३ लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार केल्यानंतर १२ जणांना घरी सोडण्यात आले, तर एका जखमीवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आग लागली. तेव्हा लोकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून खाली उड्या मारल्या. काही जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. काही लोक हॉटेलच्या खिडक्यामधून बाहेर आले आणि तिथे उभे राहिले होते.दरम्यान, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
लोकांना मदत करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.