पुणे, 10 मे (हिं.स.)।
राज्यातील जवळपास ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ऑनलाइन नोंदणीद्वारे ट्रॅकिंग करण्यात येणार आहे.
यंदा विद्यार्थ्यांना एका अर्जातच विविध भागातील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १९ मेपासून सुरू होणार असून, अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टला सुरू होतील. तर, ही प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा मानस आहे.
राज्यातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी यंदापासून केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने ‘https://mahafyjcadmissions.in/’ हे स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. राज्यात यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत होती.
या जवळपास एकूण एक हजार ७३० महाविद्यालयांमधील साधारणत: उपलब्ध सव्वा सहा लाख जागांवर साडे चार लाख विद्यार्थी प्रवेश घेत होते. आता राज्यातील एकूण ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांमधून अकरावीच्या प्रवेशासाठी साधारणत: १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध होतात. त्यावर एकूण साधारणत: १३ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे उपस्थित होते.