जम्मू, 06 जून (हिं.स.) : पहालगाममध्ये हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग करून भारतात दंगली घडवण्याचा पाकिस्तानचा डाव होता असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या चिनाब नदीवरील पुलाचे आज, शुक्रवारी मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान बोलत होते.
याप्रसंगी मोदी म्हणाले की, आई वैष्णो देवीच्या आशीर्वादाने आज काश्मीर खोरे देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे. भारताचा उल्लेख करताना काश्मीर ते कन्याकुमारी असे नेहमीच म्हंटले जाते. पण, आता या रेल्वे नेटवर्कमुळे हे सत्यात उतरले आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे. हा मुकुट एकामागून एक सुंदर रत्नांनी जडलेला आहे. ही वेगवेगळी रत्ने जम्मू आणि काश्मीरची ताकद आहेत. येथील प्राचीन संस्कृती, येथील परंपरा, येथील आध्यात्मिक चेतना, निसर्गाचे सौंदर्य, येथील औषधी वनस्पती ही येथील रत्ने आहेत. पाकिस्तानने याच भूमितील पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत या दोन्हींवर हल्ला केला. त्यांचा हेतू भारतात दंगली घडवणे, काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवणे होता.
आपला शेजारी देश मानवतेच्या विरोधात आहे. पण, जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी आता दहशतवादाला योग्य उत्तर देण्याचा निर्णय घेतल्याचे मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज 6 जून आहे. योगायोगाने एक महिन्यापूर्वी याच रात्री पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली होती. आता जेव्हा जेव्हा पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल, तेव्हा त्यांना त्यांचा लज्जास्पद पराभव आठवेल, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली.
या पुलाचे लोकार्पण म्हणजे भारताच्या एकतेचा आणि भारताच्या इच्छाशक्तीचा एक उत्सव आहे. आमच्या सरकारचे भाग्य आहे की, आमच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली आणि आम्ही ते पूर्ण केले. प्रवासात अडचणी, हवामानाच्या समस्या, डोंगरावरून सतत दरडी कोसळणे अशा विविध समस्या आल्या. हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हानात्मक होते, परंतु आमच्या सरकारने आव्हानालाच आव्हान दिले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग जम्मू-काश्मीरच्या नवीन ताकदीची ओळख आहेत.
चिनाब पूल असो किंवा अंजी पूल… हे जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचे साधन बनतील. या सुरुवातीमुळे केवळ पर्यटन वाढणार नाही, तर अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांनाही फायदा होईल. जम्मू-काश्मीरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे दोन्ही प्रदेशातील व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होतील, उद्योगाला गती मिळेल. पंतप्रधान मोदींनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. ही काश्मीर खोरे आणि जम्मू प्रदेशातील पहिली रेल्वे सेवा आहे. यासोबतच 46 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. —————-