नवी दिल्ली , 11 जून (हिं.स.)।देशभरात पुन्हा कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता पंतप्रधान मोदींना भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी आता सर्व मंत्र्यांना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकांसाठी येणाऱ्या मंत्र्यांना, तसेच त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींना आरटीपीसीआर म्हणजे कोरोना निदान चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. चाचणी केल्यानंतरच मंत्री पंतप्रधानांची भेट घेऊ शकतील.बुधवारी(दि.११) भारतातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ७ हजार पेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 चे ३०६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे. देशात सक्रिय कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असून आज ७ हजार च्या पुढे रूग्णसंख्या गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे अशी माहिती समजतं आहे.
केरळमध्ये एका दिवसात सर्वाधिक १७० नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे तेथील सक्रिय रूग्णांची संख्या २,२२३ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये ११४ नवीन रुग्णांसह १,२२३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये १०० नवीन रुग्ण आढळल्याने एकूण ४५९ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत दिल्लीत ६६ रुग्ण आढळल्याने शहरातील एकूण रुग्णसंख्या ७५७ वर पोहोचली आहे.बुधवारी (१० जून) देशात कोरोनामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर केरळामध्ये ३, तर कर्नाटकामध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला.असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.