सोलापूर, 26 एप्रिल (हिं.स.)।
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाईल्ड हेल्पलाईन 1098 शासकीय यंत्रणा, अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी सतर्क असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी.काटकर यांनी दिली.
भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात. अक्षय तृतीय हा महत्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहूर्तावर सामुदायीक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह होऊ न देणे कारण बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदविला जातो.