सोलापूर, 22 जून (हिं.स.)। मे महिन्यात धो-धो बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान केले असून, यात जिल्ह्यातील 32 हजार 415 शेतकर्यांना फटका बसला आहे. नुकसानाचा पंचनामा करुन तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.अवकाळी पावसामुळे 21 हजार 971 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात 64 कोटी 38 लाख 72 हजार रुपये मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
दरवर्षी जून पंधरवडा ओलांडल्यानंतर पाऊस पडत असतो. यंदा मात्र 10 मेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. कृत्तिका नक्षत्रातील पाऊस सहसा कोरडा जातो. मागील अनेक दशकानंतर पहिल्यादांच कृत्तिका नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर रोहिणी चांगल्या बरसल्या. मे महिन्यात साधारण 272 मिमी इतका विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अवेळी पडलेल्या जोरदार पावसामुळे आंबा, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला, पेरू यासारख्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले होते.