रायगड, 7 जून (हिं.स.) – मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मला त्यामध्ये परिपक्वता आली. ज्या ज्या वेळेस तटकरे साहेबांचे जे चुकीचे निर्णय असतील त्यांच्याविरुद्ध आम्ही काही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्ह्या कुत्र्यांची पत्रकार परिषद घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण माझा राजीनामा मागतात. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जा असे बोलता हा काय बालिशपणा आहे. ह्या जनतेने मला निवडून दिलं. खरंतर तुमचे नेते सुनील तटकरे रायगड मधून निवडून आले त्यांना भरत शेठ, महेंद्र शेठ, योगेश कदम यांनी मदत केली. खरतर आधी तटकरेसाहेबांनी राजीनामा द्यावा मग मी राजीनामा देतो… नाहीतर तुमच्या नेत्यांनी आधी राजीनामा द्यायला पाहिजे व निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. तुम्हाला जर एवढीच खुमखुमी आहे तर आधी तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या, त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो व पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जायची माझी तयारी आहे, असे आव्हान शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले. ते कर्जत पोसरी येथे झालेल्या सभेत बोलत होते.
पराभव पराभव असतो तो शांतपणे स्वीकारा. ज्या ज्या चुका तुमच्या झाल्या त्याचे आत्मचिंतन तुम्ही स्वतः करा. मी ५७०० मतांनी मी निवडून आलो आहे. जनतेने मला तो कौल दिलेला आहे. सुधाकर या आधी मित्र होता. ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट आली तेव्हा मी त्याला मदत केली आहे. मग तो कोर्टाचा विषय असो की रुग्णालयाचा विषय असो. राजकीय मतभेद असू शकतात परंतु मी अशा प्रकारे गरळ कधीच ओतली नाही.
अशाप्रकारे चुकीचे राजकारण जर केले तर ते ह्या पुढे खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना हा मतदार संघ एक केल्याशिवाय राहणार नाही.
पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही. मी शिवसेनेसाठी आतापर्यंत संघर्ष केला आहे मी कधीही राष्ट्रवादीसमोर झुकलेला नाही. आपण साऱ्यानी कर्जतच्या विकासाला प्राधान्य द्यावे.