नवी दिल्ली , 24 जून (हिं.स.)। भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. अशा दहशतवाद्यांसाठी जगात कुठेही ठिकाण सुरक्षित नाही आणि भविष्यातही सुरक्षित राहणार नाही, असा थेट आणि कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ते आज (दि.२४) नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पाकिस्तानला कडक इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२४) नवी दिल्लीत भारताचे दोन महान अध्यात्मिक व नैतिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत कठोर संदेश दिला.भारतीय नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. दहशतवाद्यासाठी कोणतेही ठिकाण लपण्यासाठी सुरक्षित नसेल. दहशतवाद्यांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या लोकांना कधीच माफ केले जाऊ शकत नाही. त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.”
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. मात्र ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. पुन्हा असा हल्ला करणा-या कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारच भारताने दिलेला आहे. पाकिस्तान दहशतवादाच्या मदतीने भारताविरुद्ध प्रॉक्सी वॉर खेळत आहे.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनिर यांनी चिथावणीखोर भाषण दिल्यानंतर भारताच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. त्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने अनेक आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये असणारे 9 पेक्षा जास्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “देशाच्या विकासासाठी सामाजिक, आर्थिक, लष्करी ताकद या सर्वांमध्ये आपल्याला सशक्त व्हायचे आहे. आज देश याच मार्गावर पुढे जात आहे. भारताची ताकद काय आहे हे जगाने नुकतेच पाहिले आहे. दहशतवादाविरुद्ध भारताची असलेली आपली कठोर भूमिका भारताने जगासमोर स्पष्ट केली आहे.