मुंबई, 5 मे (हिं.स.)।मुंबई – गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंडी येथे पनवेलहून रायगडला जाणारी एक खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात घडला आहे.ही घटना रविवारी(दि.४) रात्री अकराच्या सुमारास घडली.या घटनेत १९ प्रवासी जखमी झाले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंड येथे पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गीकेवर क्रमांक एमएच ४७ वाय ७४८७ ही खाजगी बस वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघात घडला.या बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये अमोल तलवलेकर (वय अंदाजे ३०-३२ वर्षे)असे मृत्यू झालेल्या एकाचे नावं आहे. तर एका लहान मुलीचा पाय पत्र्याने कापला गेला असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.इतर जखमींना पनवेलमधील एमजीएम व गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले.
अपघात स्थळी पनवेल महानगरपालिका व कळंबोली फायर यांचे रेस्क्यू टीम ॲम्बुलन्स व क्रेन घटनास्थळी पोचले होते.सदर अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कर्नाळा खिंडीत वारंवार अपघात होत असतात.नागमोडी वळणावर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना अर्धवट ठरत आहेत.