सोलापूर, 6 जून (हिं.स.)। श्री विठ्ठल मंदिरात समितीकडून देणगी घेऊन भाविकांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या विविध पूजांवरून आता वाद सुरू झाला आहे. पूजांच्या वाढत्या संख्येमुळे भाविकांना दर्शन रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे तुळशी पूजा तत्काळ बंद कराव्यात, अशी मागणी आता पुढे आली आहे. वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार ही दिली आहे.
सावळ्या विठुरायाची नित्यपूजा, तुळशीपूजा, पाद्यपूजा, चंदन उटीपूजा आदी प्रकारच्या पूजा देणगी घेऊन भाविकांच्या हस्ते केल्या जातात. या पूजांमध्ये बराच वेळ जात असतो. पूजा सुरू असताना भाविकांना दर्शनासाठी सोडले जात नाही. दरम्यान या पूजांमुळे दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. दोन दिवसांपूर्वी दर्शन रांगेत बराच वेळ थांबवूनही लवकरच दर्शन होत नसल्याने संतप्त झालेल्या भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.