पुणे, 25 जून (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याच्या दक्षतेसाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून म्हणजे उपमुख्यमंत्री असताना फडणवीस हे सातत्याने पुण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या पुण्याच्या दौऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका महिन्यात किमान पाच ते सात वेळा फडणवीस हे पुण्यात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावरील विशेष लक्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभेची २०२४ निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. त्यावर माझे पुण्यावर विशेष प्रेम आहे; पण लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे फडणवीस यांनी पुण्यात जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांचे पुणे दौरे वारंवार होत असत. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात कलगीतुरा रंगला होता. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना डावलून अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. पुणे महापालिकेत २०१७ साली भाजपची एकहाती सत्ता होती. त्यानंतर २०२२ नंतर महापालिकेत प्रशासकराज आहे. त्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार युतीचा निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले आहे.
—————