अमरावती, 31 मे (हिं.स.)। एसटी
प्रवासात अर्ध तिकीट दर झाल्यापासून महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसस्थानक व बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांकडून घेतला जात आहे. सोन्याचे दागिने, पैसे, मोबाइल चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महिलांनी बसस्थानकात विशेष सावध असण्याची गरज आहे.
लग्नसराईच्या कालावधीत बसस्थानकात मोठी गर्दी उसळत होती. फलाटावर बस लागताच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळते. एकमेकाला धक्के मारत प्रवासी बसमध्ये चढतात. याचा गैरफायदा चौरटे घेतात. महिलांच्या पर्समधील मोबाइल, पैसे व इतर महागड्या वस्तू अलगदपणे काढून घेतात. वेळप्रसंगी अंगावरील सोनेही चोरतात. गर्दी व बसमध्ये चढण्याच्या घाईत ही बाब लक्षात येत नाही. मात्र काही वेळानंतर चोरी झाल्याची ही बाब लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
मोबाइल बैंकिंगमुळे पर्समध्ये पैसे ठेवण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र लग्न समारंभ किंवा इतर समारंभासाठी जाताना महिला अजुनही महागडे दागिने घालून जातात. या दागिन्यांवर चोरट्यांची नजर असते.
मोबाइल, दागिन्यांवर डोळा
चोरट्यांचा प्रामुख्याने मोबाइल, सोन्याचे दागिने यांच्यावर डोळा असतो. गर्दीमध्ये डाव साधला जातो. आठवडी बाजारातही मोबाइल व दागिने चोरीला जात असतात. त्यामुळे महिला व नागरिकांनी सावध असण्याची गरज आहे.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
अमरावती येथील बसस्थानकात सिक्युरिटींची संख्या वाढविण्यात आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत दोन सिक्युरिटी या ठिकाणी तैनात असतात.