मुंबई, ११ जून, (हिं.स.) : पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने जलद लोकल गाड्या तब्बल १५ ते २० मिनिटे उशीराने सुरू होती माहीम स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी चाकरमान्यांचे हाल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या बिघाडामुळे वांद्रे आणि खार स्थानकादरम्यान तीन लोकल गाड्या एकामागोमाग एक उभ्या राहिल्या असून प्रवाशांची गैरसोय झाली होती. यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना कुठलीही स्पष्ट सूचना देण्यात आलेली नाही, यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी अखेर रुळांवर उतरून पायी चालण्याचा मार्ग स्वीकारला होता. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांना उशीराचा आणि लेटमार्कचा फटका बसणार आहे.
त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवर घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. प्रचंड गर्दीमुळे दोन लोकल गाड्यांमध्ये दरवाज्यावर लटकलेल्या प्रवाशांचा तोल गेला. दरवाजावर एकमेकांना घासल्यामुळे ८ प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडले होते. या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, तर इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
अशा ताज्या घटनेनंतरच आज पश्चिम रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
—————