अहिल्यानगर दि. 7 मे (हिं.स.) :- मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिव प्रहार संघटनेच्या वतीने व पिंपळगाव माळवी च्या ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी शिव प्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव,पिंपळगाव माळवी ग्रामस्थ आशा आढाव, वैशाली आढाव, मनीषा कराळे, अनिल वाघ, गोरक्षनाथ रणसिंग, नानाभाऊ कराळे, जालिंदर कराळे, सागर गुंड, भरत आढाव, धोंडीभाऊ कराळे, जालिंदर काळे, संगीता काळे, आशा गुंड, कांचन गुंड, शरीफा शेख आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच कै. लताबाई नानाभाऊ कराळे यांची १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी निर्गुण पणे हत्या करण्यात आलेली आहे. सदर हत्येला तीन महिने उलटून देखील अजूनही कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही. अंत्यविधीच्या वेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आश्वासन दिले होते.दोन दिवसात तपास लाऊ मात्र तीन महिने होऊन देखील कुठल्याही प्रकारचे आरोपी सापडले नाही. त्यामुळे मौजे पिंपळगाव माळवी येथील महिला व ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. तसेच गावांमध्ये पोलीस प्रशासना विरोधात ग्रामस्थांचा असतोष निर्माण झाला आहे.
हा तपास पोलीस यंत्रणेंनी गहाळ केला की काय? अशी उलट सुलट चर्चा पिंपळगाव माळवी सह परिसरातील गावांमध्ये चालू आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी येत्या ८ दिवसाच्या आत तपास लावावा अन्यथा शिव प्रहार संघटना व मौजे पिंपळगाव माळवी ग्रामस्थ पीडित कुटुंबीयांसह मंगळवार १३ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.