सोलापूर, 7 मे (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एक महापालिका, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन-चार वर्षानंतर निवडणुका होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
जिल्हा परिषद, महापालिकेवर गेल्या तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवकांकडून सातत्याने होत होती. मात्र, निवडणुुकीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका रखडल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घ्यायच्याच नाहीत का, असा सवाल उपस्थित करत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.