लाहोर , 30 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढत चालला आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.त्यामुळे पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता एक पत्रकार परिषद घेतली. मंत्री अताउल्लाह तरार यांनी दावा केला की, पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये भारत पाकिस्तानवर हल्ला करु शकतो. आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
मंत्री तरार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत म्हटलं की, पाकिस्तानला गोपनीय आणि विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पहलगाम हल्ल्याचं निमित्त करुन भारत पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये लष्करी हल्ला करु शकतो. माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचं हे विधान पंतप्रधान मोदींच्या मंगळवारी ( दि.२९) केलेल्या विधानानंतर आलं आहे. मोदी म्हणाले होते की, भारताला आता दहशतवादाविरोधातली लढाई तीव्र करावी लागेल. त्यासाठी लष्कराला मोकळीक देण्यात येत असून पहलगाम हल्ल्याच्या गुन्हेगारांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे.
पाकिस्तानी मंत्री तरार म्हणाले की, कोणत्याही आक्रमक कारवाईचं सडेतोड उत्तर दिलं जाईल. खुद्द पाकिस्तान दहशतवादाचा शिकार आहे. त्यामुळे आम्हाला हे दुःख माहिती आहे. जगभरात आम्ही कायमच दहशतवादाचा निषेध केलेला आहे. पहलगाम हल्ल्याची वस्तूस्थिती समोर यावी, यासाठी आम्ही एक पारदर्शकर आणि विश्वसनीय समिती गठीत केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वीच पाकिस्तान हायअलर्टवर असल्याचं म्हटलं होतं. देशाच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाल्यास आम्ही अण्वस्त्राचा वापर करु, असंही ते म्हणाले होते. एकूणच पाकिस्तानच्या मनामध्ये धडकी भरल्याचं चित्र दिसून येत आहे.