पंढरपूर : पंढरपूर शहरात कोट्यवधी रुपये खर्चुन विकास कामे होत आहेत. माञ पंढरपूरची अवस्था बकाल दिसत असल्याने या कामाची चौकशी करण्यात येईल. याचबरोबर कुंभार घाट दुर्घटनेतील बेजबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याची अर्थिक स्थिती नाजुक आहे, गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून खर्च भागवावा लागत आहे. पंचनामे केल्यानंतर सर्व माहिती जमा झाल्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. केंद्राने नैसर्गिक आपत्ती काळात भरीव अर्थिक मदत करावी, अशीही मागणी पवार यांनी केली. पंढरपूर शहराच्या विकासासाठी सातशे कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली मात्र त्यामानाने विकास दिसत नाही, नदीकाठच्या भागात अतिक्रमणे झाली आहेत याबद्दल त्यांनी पंढरपूर न. पा. मुख्याधिकारी यांना खडे बोल सुनावले.
ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मी सुचना केल्या होत्या…? गुन्हा दाखल केला का, असा सवाल अजित पवारांनी विचारला. या घाट बांधकामात काळी माती वापरल्याचे दिसत असून या कामाच्या चौकशीसाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही पाहणी झाल्यानंतर येत्या शुक्रवारी पुणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर शहर व तालुक्यात पुर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार हे शनिवारी पंढरपूरमध्ये आले होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, कोरोनाचे संकट असतानाही सध्या पुराचे नवीन संकट आले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यासाठी केंद्र सरकारला भरीव मदत करावी लागेल. पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची आकडेवारी समजेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज संध्याकाळी सोलापूर मुक्कामी असून सायंकाळी प्रशासनासोबत जिल्ह्यातील आढावा बैठक घेणार आहेत.
यावेळी आ. भारत भालके, आ. बबनदादा शिंदे, आ. संजय शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, राष्ट्रवादीचे संदिप मांडवे, श्रीकांत शिंदे, दीपक पवार, संतोष सुळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.