नवी दिल्ली : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. मोदींकडून तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश आहे, शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला, अशा प्रतिक्रिया आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
तब्बल 359 दिवस शेतकऱ्यांनी राजधानीच्या सीमेवर आपला लढा सुरु ठेवला. आज अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळालं. केंद्र सरकारसोबत बैठकांवर बैठका झाल्या, मात्र बळीराजा काही झुकला नाही. तो आपल्या मागण्यांवर ठाम होता. दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन अनके टप्प्यांमधून गेलं. ऐन हिवाळ्यात नोव्हेंबरमध्ये बळीराजानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली. दिल्लीत कडाक्याची थंडी होती. त्या थंडीतही बळीराजाचा निर्धार काही कमी झाला नाही. कडाक्याच्या थंडीत, रखरखत्या उन्हाळ्यात आणि कोसळणाऱ्या पावसातही बळीराजा देशाच्या राजधानीच्या सीमांवर आपल्या हक्कांसाठी लढा देत होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीनही कृषी कायदे रद्द केले जातील, असे जाहीर केले. पुढल्या संसदेच्या अधिवेशनात हे कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले. मात्र तत्काळ आंदोलन मागे घेतले जाणार नाही, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द होतील, त्यादिवशी आंदोलन रद्द केले जाईल, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला संबोधित केलं आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असं म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन देखील केलं. या, नवी सुरुवात करुया, असं म्हणत मोदींनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.
कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. सुरुवातीला गुरुनानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे.
गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
* तब्बल वर्षभर टक्कर
याआधी 80 च्या दशकात शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांनी हजारो शेतकऱ्यांसह इंडिया गेटवर बैलगाडी मोर्चा आणला होता. पण ते आंदोलन एक आठवडाभर चाललं होतं. एका आठवड्यातच राजीव गांधी सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या. पण आता याच महेंद्रसिंह टिकैत यांचे पुत्र राकेश टिकैत हे मोदी सरकारसोबत तब्बल वर्षभर टक्कर देत आहेत. अखेर त्यांनाही यश आले.