पंढरपूर / सोलापूर : कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी मंदिर समितीच्या वतीने त्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. Deputy Chief Minister Devendra Fadnavis honored with Kartiki Ekadashi Mahapuja Such a blessing of Vitthal
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर नवीन भक्त निवास येथे मंदिर समितीची बैठक पार पडली. यास समितीचे सदस्य मधवीताई निगडे, शिवाजी महाराज मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, ज्ञानेश्वर महाराज जळगाकर, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, अतिरीक्त जिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार संपूर्ण पंढरपूर शहर व पालखी मार्गापर्यंत एकच आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्याचे काही दिवसांपूर्वी सादरीकरण करण्यात आले असून यामध्ये दर्शन मंडप पाडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र आजच्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये औसेकर महाराज यांनी सदर दर्शन मंडप पाडण्याचा कोणताही ठराव समितीने केला नसल्याचे सांगितले.
सदर दर्शन मंडप पाडण्याबाबत प्रशासनाने मंदिर समितीशी कोणतीही चर्चा देखील केली नाही. सदर दर्शन उभारण्यासाठी शेकडो भाविकांनी देणग्या दिल्या असून प.पू.डोंगरे महाराज यांच्या सारख्या थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे. यामुळे सदर दर्शन मंडप पाडण्यापेक्षा यामध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी आमची सूचना आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले.
□ असा कोणता ठराव झालेला नाही
काही दिवसांपूर्वी मंदिरात भजन, किर्तन करण्यास बंदी करण्यात आली होती. हा निर्णय घेताना तत्कालीन कार्यकारी अधिकारी यांनी पूर्वीच मंदिर समितीने असा ठराव केला असल्याचे कारण दिले होते. मात्र आज औसेकर महाराज यांनी, असा कोणताही ठराव आमच्या समितीने किंवा पूर्वीच्या समितीने केला नसल्याचा दावा केला. तसेच यापुढे देखील कोणतीही समिती असा ठराव करणार नाही.
कारण मंदिरातील परंपरेचे जतन करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगितले. मंदिर समिती चालवित असलेल्या गोशाळेबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. समितीच्या वतीने गोशाळे मध्ये आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. यावर बोलताना औसेकर यांनी, समिती गोशाळा बंद करणार नसून यामध्ये अधिकाधिक सुविधा देण्याबाबत निर्णय झाला असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान आजच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमधील कर्मचार्यांच्या पगार वाढीबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचार्यांच्या मागणीनुसार पगारवाढ, भक्ता वाढ याबाबत ठराव करून शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यावर शासनाकडून सूचना आल्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 उपमुख्यमंत्र्यांना विठ्ठलाचा असाही आशीर्वाद
यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून मंदिर समितीकडून फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. यामुळे विठ्ठलाची आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही वेळी महापूजा करण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे.
आषाढी व कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळविणारे फडणवीस हे पहिले राजकारणी ठरणार आहेत. परंपरेनुसार आषाढीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. यावर्षी नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीची महापूजा केली होती. आता या सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पाहिले राजकारणी असतील ज्यांना आषाढी व कार्तिकी या दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा योग्य येणार आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ या काळात एक वर्षाचा अपवाद वगळता फडणवीस यांनी चार वेळा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली होती.
यात २०१८ मध्ये मराठा आंदोलन सुरु असताना आंदोलकांनी विरोध केल्यामुळे फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर आषाढीची महापूजा केली होती. पण आता पुन्हा फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यामुळे ते पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार आहेत. यामुळे आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा मान मिळणारे फडणवीस पहिलेच राजकारणी ठरणार आहेत.