संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या कलावंतांनी आपलं सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राचा मंगल कलश मराठी जनतेच्या हाती ठेवला त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. बार्शीपुत्र शाहीर अमर शेख यांची आज जयंती. Son of Barshi, Shaheer is the immortal Sheikh of Maharashtra
अमर शेख हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या भारत देशाचे शाहीर होते असं लोककलावंत आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे सांगतात. “अमर शेखांची शाहिरी केवळ एका चळवळीपुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील तसेच देशातील कामगार, दलित, बहुजन, महिला, कष्टकरी यांची हाल-अपेष्टा आणि कष्टाच्या बेडीतून सुटका करवून देणारी आहे, ” असं मत चंदनशिवे यांनी मांडलं.
मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी बार्शी येथे झाला. गरीब कुटुंबात जन्मलेल्या अमर शेख यांना विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कर्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांच्या मित्रांनी ‘अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले.
आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता.
जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. त्यांच्या बर्याचशा रचना प्रासंगिक असल्या तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. ‘कलश’ (१९५८) आणि ‘धरतीमाता’ (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, ‘अमरगीत’ (१९५१) हा गीतसंग्रह आणि ‘पहिला बळी’ (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. अशा या लोकप्रिय शाहिराचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.