● डाकबंगल्यात उत्तरासाठी आलेले प्रश्नच घेऊन गेले
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; त्यांच्यासोबतीला जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवाय अन्य काही मंत्री आणि वरिष्ठांचेही वरिष्ठ अधिकारी एकाचवेळी सोलापूर दौऱ्यावर आलेले.Chief Minister, Deputy Chief Minister left as soon as they arrived in Solapur; Citizens who came with hope returned disappointed Dak Bungalow Devendra Fadnavis Eknath Shinde त्यांच्या समोर आपले प्रश्न मांडून, निवेदने देऊन समस्या सोडवून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील शेकडो नागरिकही जिल्ह्यातून सोलापुरात आलेले. मंत्रिमहोदय सर्वांची निवेदने डाकबंगल्यातच स्वीकारणार असल्याचे त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आलेले. मात्र झाले उलटेच. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जसे आले तसे निघून गेले. त्यांच्या भेटीतून उत्तर मिळवण्यासाठी आलेले नागरिक स्वतःचा प्रश्न आहे तसा घेऊन निराशेने निघून गेले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यासह अन्य काही मंत्री, राज्यातील वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकारी रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांना भेटून विविध समस्यांचे निवेदन देऊन प्रश्न सोडवून घेण्यासाठी जिल्ह्यातून शेकडो नागरिक सोलापुरात आले होते. सर्वांची निवेदने सातरस्ता परिसरातील डाकबंगल्यातच स्वीकारली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
त्यामुळे निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांची डाकबंगल्यात गर्दी झाली होती. निवेदनकर्त्यांना पोलिसांनी डाकबंगल्यातून बाहेर पडून दिले नाही आणि मंत्रिमहोदय डाकबंगल्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे विविध समस्यांनी पछाडलेले नागरिक त्यांची समस्या आहे तशी सोबत घेऊन निराशेने निघून गेले.
● सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रच येणार असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी अकरापासूनच डाकबंगल्यात गर्दी केली होती. दुपारी बारानंतर या गर्दीत वाढ होत गेली. दुपारी तीनच्या सुमारास तर गर्दी आवरण्यासाठी वेगळा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सायंकाळी पाचच्या दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विमान उडाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर डाकबंगल्यातली गर्दी ओसरली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● शेतकरी, कर्मचारी, कामगार अन् मजूर….
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले; मात्र त्याची भरपाई मिळाली नाही, असे शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे होते. बारा-बारा वर्षे काम केल्यानंतर घरी पाठवलेले वीज मंडळातील कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. आपली जगावेगळी समस्या घेऊन तृतीयपंथी समुदाय डाकबंगल्यात एकवटला होता. शेतमजूरही आपले दुःख मंत्रिमहोदयांना सांगण्यासाठी आले होते. विविध पक्षांचे काही कार्यकर्तेही स्टार्चचे कडक कपडे घालून आले होते. पण सर्वांचीच निराशा झाली.
● प्रलंबित प्रश्न राहिले प्रलंबित
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न घेऊन नागरिक आले होते. गेल्या अनेक महिन्यांनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकत्रच सोलापुरात आले होते. डाकबंगल्यात निवेदनकर्त्यांची गर्दी झाली होती. पण झाले उलटेच. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होटगी रोड विमानतळावरून कार्यक्रमस्थळी गेले. कार्यक्रम आटोपून थेट विमानतळ गाठले. त्यामुळे निवेदने देताच आली नाहीत. परिणामी प्रलंबित प्रश्न प्रलंबितच राहिले.