□ आदिनाथ कारखान्याच्या 27 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
Adinath co-operative sugar factory was saved from the clutches of those who attacked the factory, now don’t get tensed – Chief Minister Eknath Shinde Karmala
□ रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसह करमाळा तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
सोलापूर – आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी अनेक दिग्गज टपलेले होते. या टपलेल्यांच्या तावडीतून कारखाना वाचविला असून आता टेन्शन घेवू नका, असा टोला आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात लगावला.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 27 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आदिनाथ कारखाना भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी अनेक दिग्गज टपलेले होते. त्या दिग्गजांच्या तावडीतून हा कारखाना वाचवण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल यांनी विशेष प्रयत्न केले. तानाजीराव सावंत यांनी या कारखान्यासाठी विशेष मदत केली आहे. हा कारखाना सुरळीतपणे चालणार आहे यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. हा कारखाना सुरळीत चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रकारची मदत केली जाईल. याचबरोबर करमाळा तालुक्यातील रखडलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर आहोत. ज्या पद्धतीने कारखान्यासाठी एकत्र आलेला आहात त्याच पद्धतीने निवडणुकीत एकत्रया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, भैरवनाथ शुगरचे शिवाजी सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, कार्यकारी संचालक अरुण बागनवर, हरिदास डांगे ,भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, सभापती पृथ्वीराज पाटील उपाध्यक्ष रमेश कांबळे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, लहान क्षमतेचे कारखाने जाणीवपूर्वक चालू द्यायचे नाहीत व मग ते कारखाने आर्थिक डबघाईला आले की भाडेपट्टा तत्वावर अथवा कमी पैशात विकत घ्यायचे असा प्रकार अनेक वर्षांपासून विरोधी मंडळी करत आहेत. यामुळे सहकार धोक्यात येऊ लागला होता व ठराविक मंडळीच आर्थिकदृष्ट्या मोठी होत चालली होती. आम्ही सहकार जपणारे आहोत. यामुळे आता शेतकऱ्याला न्याय देणारे मुख्यमंत्री असल्याने यापुढे असले कारखाना खरेदी विक्री करण्याचे प्रकार थांबतील, असा टोला त्यांनी पवारांचे नाव न घेता लगावला.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आदिनाथसाठी लागणारी सर्व मदत केली जाईल. तिजोरीच्या चाव्या शिवाजी सावंत यांच्याकडे आहेत आणि ते तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळे तुम्ही कसली ही काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांनी अल्पावधीतच घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाची यादी कथन करुन आरोग्य विषयी व खास करून महिलांच्या सन्मान व आरोग्याविषयी सुरु केलेल्या नवीन योजनाविषयी माहिती दिली.
यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील यांनी कारखान्याचा उभारणीचा इतिहास सर्वासमोर मांडत कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी कारखाना उभारणीसाठी केलेला त्याग आपल्या भाषणातून सांगितला. तसेच आदिनाथ कारखान्याची स्थिती भक्कम व्हावी म्हणून खेळते भांडवल कर्जापोटी राज्य शासनाकडे 25 कोटीची तातडीची मदत आदिनाथला करावी अशी मागणी केली.
करमाळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येईल. त्यामुळे ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. कार्यक्रमासाठी आदिनाथ, मकाई चे संचालक, सर्व जि.प.व प.सं सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रश्मी बागल यांनी केले तर आभार चेअरमन डोंगरे यांनी मानले.
● सरपंचाचा विशेष सत्कार
नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींपैकी 21 ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकवल्याबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांचा निवडून आलेल्या सरपंचासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
□ मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
– करमाळ्यात आरोग्य केंद्र उभारावे यासाठीचे निवेदन आले आहे
– आरोग्य मंत्र्यांकडे बघत मुख्यमंत्री म्हणाले, तानाजीराव हे तर तुमच्याकडे आहे. लगेच करुन टाका.
– स्वतः हीत, स्वतःच स्वार्थ बाजूला ठेवले की मागे वळून बघावे लागत नाहीत
– हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी काही लोकांनी खूप प्रयत्न केले
– मात्र मी तानाजी सावंताना सांगितले सहकारी साखर कारखाने वाचले पाहिजे असे सांगितले त्यांनी लगेच ते केले.
– तानाजीरावांचे काम खूप फास्ट असते
– कारखान्याच्या माध्यमातून आपण एकत्र आलात पण भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहा
– आदिनाथ कारखाना फीनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल
– महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे
– आपण ऊस गाळपात उत्तर भारतापेक्षा गाळपात पुढे आहोत
– वेळेत एफआरपी देणारे राज्य म्हणून महाराष्ट्रची ओळख आहे
– निर्यात बंदी उठवण्यासाठी मी आणि देवेंद्रजीनी पंतप्रधान मोदींकडे विनंती केली आहे
– सत्तेत आल्यापासून मंत्रीमंडळ बैठकीत, जे सिंचन प्रकल्प थांबले होते ते सुरु केले.
– जवळपास १८ प्रकल्प पुन्हा सुरु केले
– भुविकास बॅंकेचे 964 कोटीचे कर्ज माफ केले
– ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी खात्यात दिले
– अल्पावधीत लोकप्रिय झालेले सरकार आहे
– लोकांना न्याय देणारे निर्णय आम्ही घेतले. प्रत्येक घटकाला न्याय देणारे सरकार आहे