सांगली : धनगर आरक्षणाबाबत 10 महिन्यापासून झोपी गेलेल्या कुंभकर्ण सरकार विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलनाची घोषणा पडळकर यांनी केली आहे.
सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पडळकर यांनी आंदोलनाची घोषणा केली. धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यभरात धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सरकार सत्तेमध्ये आलेले आहे. मात्र धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेलं नाही,तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुदी केली होती. मात्र त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही. याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नसल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
* विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवणार
आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सुरुवात झाली असून 25 सप्टेंबर रोजी आपण पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात हे आंदोलन करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे पडळकर यांनी म्हंटले आहे.