नवी दिल्ली : केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून उद्योेगपतींच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत. कृषी विधेयकापाठोपाठ कामगार कायद्यात मनमानी पद्धतीने बदल करून केवळ उद्योजकांचे हित जोपासणा-या मोदी सरकारच्या धोरणाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
कृषी कायद्याप्रमाणेच कामगार कायद्यातील बदलांनाही विविध कामगार संघटना तसेच राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या दुरुस्तीसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतक-यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन,’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
संसदेने तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली आहेत. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. कामगारांची भरती वा कपात, कामाचे तास, कामगारांचा संप, कामगारांचा नोकरीचा कार्यकाळ अशा कळीच्या मुद्द्यांवर लवचीकता दाखवता येणार आहे. मात्र या संहितांमुळे कामगार संघटनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.