□ कुटुंबीयांच्या आक्रोशाने परिसर गहिवरला, काटेरी झुडपाला अडकला होता मृतदेह
अक्कलकोट : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीत वाहून गेलेल्या शेतक-याचा मृतदेह दोन दिवसांनी तब्बल 40 तासाने शोधकार्यातून मिळून आला आहे. Body of farmer who was washed away in Harna river found after 40 hours Bridge South Solapur Musti
तुळजापूर तालुक्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने हरणा नदीला महापूर आला आहे. या पुराच्या पाण्यात मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी शुक्रवारी (ता. 14) रात्री आठच्या सुमारास वाहून गेला. ग्रामस्थ, नातेवाईकांच्या अथक शोध मोहिमेनंतर तब्बल ४० तासाने आज रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुस्तीपासून दीड किलोमीटर अंतरावर हरणा नदीच्याच पात्रातील काटेरी झुडपाला अडकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
शिवानंद शरणप्पा वाले ( वय ५६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृतदेह हाती लागताच नदी काठावर जमलेले कुटुंबीय व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने हरणा नदी काठासह मुस्ती परिसर अक्षरश: गहिवरला. हरणा नदीला पूर आल्यानंतर मुस्ती परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत या पुराने दुसरा बळी घेतला आहे. अनेकांनी जीव धोक्यात घालून नदीतील पाण्याचा प्रवाह ओलांडून स्वतःला वाचविले आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी नागरिक भयभीत होत आहेत.
शेतकरी वाहून गेल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ, तरुणाने नदीपात्रात ट्यूबवर बसून शनिवारी दिवसभर शोध घेतला. पण त्यांचा तपास लागला नाही. आज रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नागराज मोरडे यांच्या शेताजवळ काटेरी झुडपाला मृतदेह अडकल्याचे एका युवकाला आढळून आले. तत्काळ त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली.
मयत शिवानंद वाले यांना पाण्यातून शोधून बाहेर काढण्यासाठी सरपंच नागराज पाटील, गावकरी सुनील कारभारी, राजेंद्र हरे, ओंकार कुर्ले,पप्पू दबडे,प्रणव वाले, अभिजीत वाले, शेखर दबडे,तोरकडे, करपे यांच्या सह आदीची सहकार्य लाभले. सुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सोलापुरात आणण्यात आले. सायंकाळच्या सुमारास शवविच्छेदन करून रात्री मुस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ हरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी
जुलैमध्ये हॉटेल कामगाराचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. शिवानंद शरणप्पा वाले (वय ५६, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शिवानंद वाले हे शेतातील काम आटोपल्यानंतर शुक्रवारी रात्री घरी येत होते.
रात्रीच्या काळोख्या अंधारात नदीपात्रातील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. यामुळे ते वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळपासून ते रात्रभर आणि रविवारी सकाळपर्यंत शोध घेण्यात आला. त्याच नदीपात्रामध्ये वाले यांचा मृतदेह आढळला. १७ जुलै रोजी झालेल्या पावसात नदीला मोठा पूर आला होता.
या पुरात शौकत रशीद नदाफ (वय ३८, रा. आनंदनगर, बेघरवस्ती, मुस्ती) याचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शौकत हा मुस्ती गावातील एका हॉटेलमध्ये काम करून आपले घर चालवत होता. नेहमीप्रमाणे हॉटेलमधील काम संपवून रात्री तो बेघर वस्तीवरील आपल्या घरी निघाला होता. हरणा नदीतून जाताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला. त्यानंतर अशा दुर्घटना घडू नये म्हणून मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
अनेक वर्षापासून हरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी करुनसुध्दा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नव्हते. या युवकाच्या मृत्यूनंतर प्रशासन हलले. त्यानंतर मुस्ती- आरळीदरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने पाठविला आहे.
● आपत्कालीन पथक, नायब तहसीलदार घटनास्थळी दाखल
दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत असताना काटेरी झुडपाला अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. निवासी नायब तहसीलदारही घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या अडचणी समजावून घेतल्या. सरपंच नागराज पाटील व ग्रामस्थांनी मयत वाले वारसदारांना आर्थिक मदत मिळण्याबाबत व पूल बांधण्याच्या संदर्भात त्यांना निवेदन दिले.
● आनंदनगरची वाट बिकट
मुस्ती गावाजवळून हरणा नदी वाहते. नदीच्या पलीकडे आनंदनगर (बेघरवस्ती) हा दोन हजार लोकवस्तीचा भाग आहे. नदीला पाणी आल्यानंतर पलीकडे जाताना ग्रामस्थांना संकटाला तोंड द्यावे लागते.
□ हरणा नदीवर पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा सुरू
दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात सखाराम गायकवाड हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अनेक जण पाण्यात वाहून गेले. अनेक जण सुदैवाने वाचलेही आहेत. तीन-चार महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे बेघर वस्तीला जोडणाऱ्या या रस्त्यावर पूल बांधण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे, असे सरपंच नागराज पाटील यांनी सांगितले.