नागपूर : पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यिक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे. कवी आणि विचारवंत यशवंत मनोहर यांनी त्यांना देऊ केलेला जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी मागणी त्यांनी विदर्भ साहित्य संघाकडे केली होती.
विदर्भ साहित्य संघाच्या 98 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना जीवनव्रती पुरस्कार दिला जाणार होता. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्यिकांना कै.ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या नावाने जीवनव्रती पुरस्कार दिला जातो. यावेळी हा पुरस्कार आंबेडकरवादी साहित्यिक यशवंत मनोहर यांना देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. 14 जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या 98 व्या वर्धापन दिनाला त्यांना हा पुरस्कारही देण्यात येणार होता. पण त्यांनी व्यासपीठावर सरवस्तीची प्रतिमा ठेवण्यावर आक्षेप घेतला, तसंच आपण हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मागणी केल्यानंतरदेखील परंपरेप्रमाणे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली, यामुळे नाराज मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
“डॉ.ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल, असं वाटलं होतं, पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे”, असे पत्र डॉ. मनोहर यांनी साहित्य संघाला पाठवले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतःनाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही”, असेही त्यांनी म्हटलं आहे.
मात्र साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी सरस्वतीचा फोटो हा साहित्य संघाची प्रथा-परंपरेचा भाग असून हॉलचे नावचं रंगशारदा असल्याचे सांगितले. या वेळी महाराष्ट्रातील इतर अनेक लेखकांना त्यांच्या साहित्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.
इंग्रज यायच्याआधी भारतात सरस्वतीलाच पूजलं जात होतं, पण मग तरीही देशातील स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र का अज्ञानी राहिले? माझा सरस्वतीशी काय संबंध? कार्यक्रम साहित्याशी संबंधित आहे, मग त्यात कुसुमाग्रज, मुक्तीबोध किंवा इंदिरा संत यांची प्रतिमा ठेवायला हवी. मी माझं मत विदर्भ साहित्य संघाला कळवलं, पण त्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारला,’ असं यशवंत मनोहर म्हणाले.